औरंगाबाद- लोकार्पण होण्या अगोदरच महापौरांनी स्मार्ट बसचा मोठा गाजावाजा केला होता. सेना-भाजपमध्ये झालेल्या कुरघोडीच्या राजकारणाचे कारण ठरलेलया स्मार्ट सिटी बसचा २३ डिसेंबर रोजी लोकार्पण सोहळा होणार आहे. असे असताना ज्या पाच बसचे लोकार्पण होणार आहेत. त्याच अजून शहरात दाखल झाल्या नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
मनपाच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर बस सेवा सुरू करण्याचा गेल्या बऱ्याच दिवसांपासून जोरादार प्रयत्न महापौर करत होते. स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या काही महत्त्वपूर्ण प्रकल्पापैकी हा प्रकल्प चर्चेचा आणि तेवढाच महत्वाचा. गेल्या कित्येक दिवसांपासून या बसची बांधणी बंगळुरू येथील टाटा कंपनीच्या प्रकल्पात सुरू आहे. टाटा कंपनीनेच या बसची बांधणी व रंगरंगाेटी पूर्ण केली. एकूण शंभर बस असलेला हा सिटी बस प्रकल्प असून यातील डिसेंबर अखेर ५० तर जानेवारी महिन्यात ५० बस महापालिकेला मिळणार हाेत्या. पण अद्याप केवळ एकच बस शहरात आलेली आहे. २३ डिसेंबरच्या मुहूर्तावर पाच बसचे लोकार्पण करण्याचे मनपाने ठरवलेले आहे. तर उर्वरित ३८ बस या ३१ डिसेंबर पर्यंत शहरात दाखल होणार आहेत. या लोकार्पण सोहळा करीता मुख्यमंत्र्यां पूर्वी आदित्य ठाकरे यांची वेळ घेतल्याने सेना-भाजपमध्ये बरेच शाब्दिक वाद झाले.
निमंत्रण देण्याकरिता बुधवारी मुंबईला गेलेल्या महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट न घेताच मुख्यमंत्र्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याचा निरोप पाठविला होता. परंतु आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ज्या पाच बसचे लोकार्पण करण्यात येणार आहे त्या लोकार्पणला दोन दिवस शिल्लक असतानाही शहरात दाखल झालेल्या नाहीत. या बस बाबत टाटा कंपनीच्या संबंधितांना गुरुवारी घोडेले यांनी विचारणा करताच साहेब त्या बस २३ डिसेंबर सकाळ पर्यंत पाठवतो असे म्हणताच घोडेले भडकले. यावर उपायुक्त संजय कवडे यांना कंपनीचे काम पाहणाऱ्या स्थानिक अधिकार्यांशी बोलून २२ डिसेंबरलाच सायंकाळपर्यंत बस शहरात दाखल झाल्या पाहिजेत. असे नियोजन तत्काळ करा असे सांगितले. त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रमापर्यंत तरी या बस दाखल होतील काय असा प्रश्न उपस्थित होतो.